माझे एक संस्मरणीय शिक्षक
(श्री.हरिश्चंद्र संतराम आयतनबोने)
शाळेचे नाव ः जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नांदुर्गा
ता औसा जि.लातूर
सध्या कार्यरत ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरुळ ता.औसा जि लातूर.
मला आठवतं तस मी पाचवीला होतो. म्हणजे वर्ष १९९८ ला तुम्ही आमच्या गावात आलात.आणि त्यावेळी नांदुर्गा गावाची शैक्षणिक ओळख गावापूरतीच मर्यादित होती. व गावातील मुलांमध्ये असणारी क्षमता, असणारे कौशल्य खेळ व अभ्यासाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना तालुका व जिल्हापातळीपर्यंत नांदुर्गा गावाचे व गावातील मुलांची ओळख जिल्ह्याला करून दिली.व जिल्हा पातळीवर औसा तालुक्यातून सर्व गावे दुसरा नंबर कोणाचा येणार फक्त यासाठीच स्पर्धा करत असत. कारण संपूर्ण तालुक्यात नांदुर्गाच प्रथम येणार हे लोकांना पक्का विश्वास होता.
या सगळ्यामागे तुमचे अथक प्रयत्न, मेहनत ही तितकीच मोठी होती.
त्यावेळेस सुरुवातीला तुम्ही शाळेतच राहत असत.सकाळी ५-६ पासून तुमच्या दिवसाला सुरुवात व्हायची.काही मुले दररोज संध्याकाळी अभ्यासाला पण तुमच्यासोबत असायचे.त्यात मीपण होतो.सकाळी लवकर उठवून सर्वांना सकाळी व्यायामला घेऊन तुम्हीही सोबत व्यायाम करायचेत.रनिंग ,कवायत,योगासने व त्यानंतर सकाळी खेळाची थोडी प्राक्टीस घेत असत.मग आम्ही सर्व मुले घरी जाऊन आंगोळी करून परत शाळेत यायचो. ज्या मुलांना अभ्यासात रस नव्हता त्यांना तुम्ही खेळातून रस निर्माण केलात व ती मुले पुढे चालून अभ्यासातही चांगली झाली.शाळेत तुम्ही आल्यापासून माझ्या अभ्यासात खूप फरक पडला.त्याचाच परिणाम म्हणून मी ही तुमच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करत आहे. दिवस भर तुम्ही शिकवण्याचे काम करून शाळा सुटल्यानंतरही ज्यादा वेळ तास घेत असत. खेळांचे सराव सायंकाळी शाळासुटल्यानंतरही घेत असत.रात्री आम्ही येण्याच्या आत तुम्ही खिचडी भात काहीतरी खाऊन बसायचेत.आज ते दिवस आठवले तर खरच डोळ्यात पाणी येते सर.कारण आज परिस्थिती पाहिली तर पालकांकडे स्वतःच्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही.पण तुम्ही गोरगरिबांच्या मुलांसाठी भरपूर केलात.लिहिण्यासारखं बरेच आहे.कधी खेळांच्या स्पर्धेला गेलो.तर काही मुलांकडे पैसे नसायचे खाऊ घेण्यासाठी त्यावेळेस तुम्ही कधीही लोकांची मुले आहेत. पालकांनी दिले नाहीत आपण कशाला द्यायचे असा मनात कधीही विचार आणला नाहीत.
तुमच्या १० ते १२ वर्षाच्या काळात तुम्ही नांदुर्गा गावाचा कायापालट केलात.तुमच्यामुळे अनेकजण आज चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत.आणि तुमचं १०ते १२ वर्षाचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळाले हे आमच्या सर्व नांदुर्गा वासियांचं भाग्य समजतो.
पण तुम्ही जसेही नांदुर्गा गावातून बदलून गेलात.तसे हळूहळू नांदुर्गा गाव खेळ व अभ्यास या दोन्हीही बाबतीत पिछाडत चालल्याचे दिसून येत आहे.
सदैव मी आपला ऋणी आहे सर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा